twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣7⃣

*👨🏻‍🏫 ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार,*

*_मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण_*

Monday, 25 Dec,2017

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तेही जिल्हा परिषदेतील शाळेत ई-लर्निंगची सुविधा मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या संमेलनाचे आकर्षण ठरले. वडवणी तालुक्यातील देठेवाडी ही दोन शिक्षकांची शाळा. रवींद्र गायकवाड हे शाळेचे मुख्याध्यापक ध्येयवेडे शिक्षक आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांची ही शाळा. या शाळेतील विद्यार्थ्यांना गरिबीमुळे व शासनाच्या निधीअभावी ई-लर्निंगचे शिक्षण व टॅब कसे मिळणार? ही समस्या गायकवाड गुरुजींना भेडसावू लागली.
त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या लग्नात सासरवाडीकडून मिळालेली अंगठी मोडली. या अंगठीतूनही ई-लर्निंगचा खर्च निघेना म्हणून त्यांनी भविष्य निर्वाह निधीची ५० हजारांची रक्कम कर्जरूपी उचलली व या माध्यमातून शाळा ई-लर्निंग केली. प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब दिले. इतकेच नाही तर देठेवाडीची शाळा मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दूर होती.

या शाळेला जायला डोंगरदर्‍याचा रस्ता. गायकवाड गुरुजी शाळेत जाता-येता रस्त्यावरील दगड उचलून दूर करण्याचे काम करीत. या ध्येयवेड्या शिक्षकाची कहाणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर आली आणि त्यांनी आजच्या साहित्य संमेलनात रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक भरपेहराव आहेर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. एक अंगठी विद्यार्थ्यांसाठी मोडणार्‍या या गुरुजींना यावेळी दोन अंगठ्या भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या विशेष सत्काराने उपस्थित सर्वच पाहुण्यांनी गायकवाड गुरुजींच्या कार्याचा गौरव सातत्याने आपल्या भाषणातून केला.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣6⃣

*जिद्द आणि मेहनत... मुंबईच्या तरुणाला थेट इस्रोत नोकरी!*

*_प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे._*

By: वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई .
Tuesday, 5 December
      
मुंबई : प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे. या तरुणाने दहा बाय दहाच्या खोलीत रात्रंदिवस अभ्यास करुन थेट इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळवली आहे

प्रथमेशने पहिले ते दहावीपर्यंतचं शिक्षण अगदी साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत केलं. त्यांनतर कॉलेजमध्ये प्रवेशाची वेळ आली त्यावेळी त्याने आपली आप्टिट्यूड टेस्ट दिली आणि त्यात त्याला कला शाखेत प्रवेश घेण्याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात आलं. मात्र, आपल्याला इंजिनिअरींग करायचं असा प्रथमेशनं आपल्या आई-वडिलांना सांगितलं.

आपली जिद्द कायम ठेवत प्रथमेशनं इंजिनिअरींगचं शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याने टाटा, एल अँड टी या सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केलं.पण त्यावर समाधान न मानता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसोबत इस्रोच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासही प्रथमेशने सुरु ठेवला.
मे महिन्यात जेंव्हा 16000 विद्यार्थ्यांमधून प्रथमेशची निवड इस्रोमध्ये झाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. जे स्वप्न प्रथमेशनं पाहिलं होतं ते त्यानं सत्यात आणलं होतं. प्रथमेश हा मुंबईतून पहिला वैज्ञानिक आहे जो इस्रोमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣4⃣

_जागतिक एड्स दिन विशेष_

*HIV वर मात करणाऱ्या रत्ना यांना थेट स्वित्झर्लंडचं निमंत्रण*

_साभार - अभिजीत कांबळे, BBC News Marathi._

लग्नानंतर काही वर्षातच नवऱ्याचा HIVने मृत्यू झाला. त्यानंतर 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्यानं दम तोडला. या आघातामुळे मग त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण नशीबात काही औरच लिहिलं होतं.

आज त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावली आणि सर्वांना अचंबित केलं. ही कहाणी आहे रत्ना जाधव यांची.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातलं टाकळी खंडेश्वरी नावाचं एक गाव. इथल्या रत्ना जाधव यांचं वयाच्या 15व्या वर्षीच एका वाहनचालकाशी लग्न झालं.

आपल्या नवऱ्यासोबत त्यांनी पनवेलला संसार थाटला. पण लग्न होऊन दीड वर्ष झालं नाही, तोच त्यांचे पती सारखे आजारी पडू लागले. त्याचवेळी रत्ना गरोदर राहिल्या.

नवव्या महिन्यात रत्ना बाळंतपणासाठी माहेरी आल्या असताना तिकडं पनवेलमध्ये नवऱ्याची तब्येत आणखी खालावू लागली. दरम्यान रत्ना यांना मुलगा झाला.

मुलगा काही आठवड्यांचा असतानाच रत्ना यांची सासू त्यांच्याच्याकडे आली आणि रत्ना यांना घाईघाईनं पनवेलला घेऊन गेली.

पनवेलला पोहोचल्यावर रत्ना यांना धक्काच बसला. नवऱ्याच्या आजारपणामुळे केलेल्या तपासणीत त्याला HIV असल्याचं उघड झालं होतं.

रत्ना हादरूनच गेल्या. आता त्यांचीही HIV चाचणी करावी लागणार होती.

रत्ना यांची मुंबईत तपासणी झाली आणि दुर्दैवानं त्यांची भीती खरी ठरली. रत्नालाही नवऱ्यापासून HIVचं संक्रमण झालं होतं. तिथून सुरू झाला एक अत्यंत वेदनादायी आणि खडतर प्रवास.

रत्ना यांच्याच तोंडून ऐकायचं तर, "आम्हा नवरा-बायकोला HIV असल्याचं कळल्यावर पहिला धक्का बसला तो पनवेलमध्ये. आम्ही ज्या सोसायटीत राहत होतो ती सोसायटी सोडावी लागली. आमच्या आजाराबद्दल कळल्यानंतर काही लोकांनी आम्हाच्या तिथं राहण्याला आक्षेप घेतला."

"मग आम्ही माझ्या नवऱ्याच्या बीड जिल्ह्यातल्या गावी आलो. तिथं काही दिवस राहिलो नाही तोच गावातल्या लोकांचा त्रास सुरू झाला. सासरच्यांनाही वाटू लागलं की आम्ही त्यांच्यासोबत राहायला नको. शेवटी आम्हाला गाव सोडून शेताचा आसरा घ्यावा लागला."

"हळूहळू नवऱ्याची प्रकृती आणखीनच ढासळू लागली. एका दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनं हात लावायलाही नकार दिला. अखेर 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला," असं रत्ना सांगतात.

नवरा गेला आणि मग सासरच्यांनी रत्ना यांना त्यांच्यासोबत राहू दिलं नाही. म्हणून त्या माहेरी आल्या आणि आईसोबत राहू लागल्या.

"पण आईच्या मैत्रिणींनी तिला HIVबद्दल भीती घातली, 'हिला सोबत ठेवलं तर तुम्हालाही आजार होऊ शकतो'," रत्ना सांगतात.

"मग आईलाही भीती वाटू लागली की माझ्यामुळे माझ्या भावंडांना HIV होईल. आई मला लांबच ठेऊ लागली. अखेर मी माझ्या बाळाला घेऊन वेगळी राहू लागले."

"सुरुवातीला घरकामाला, शेतावरच्या कामाला जाऊ लागले. पण काही दिवस काम केल्यानंतर माझ्या आजाराबाबत त्यांना कळलं की तेही काम हातातून जायचं," जुन्या आठवणी त्या सांगत होत्या.

काही दिवस त्यांची अक्षरश: उपासमार झाली. मग रोजगार हमीचं काम मिळालं.

मग एके दिवशी, बाळ 11 महिन्यांचं असताना, त्या कामावरून घरी आल्या आणि पाहिलं की त्यांच्या बाळानं दम तोडला होता.

"माझं बाळ जाण्याचा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. आता आपण जगून काही उपयोग नाही, असं मला वाटलं आणि मीही विष प्यायले."

पण रत्नाच्या शेजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं, म्हणून त्यांचा जीव वाचला.

नवरा गेला, मूल गेलं, एकदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्नही झाला. पण रेखाच्या नशीबात काय होतं, कुणास ठाऊक?

पुढच्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, "त्यानंतर जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणारी एक आरोग्यसेविका माझ्या संपर्कात आली. ती मला प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळेंकडे घेऊन गेली. त्यांनी लगेचच माझ्यावर औषधौपचार तर सुरू केले."

सोबतच, डॉ. आरोळेंनी रत्नाला प्रकल्पाच्या खडकतमधल्या शेतावर नोकरी दिली. त्यांनी तिथं कामाला सुरुवात केली खरी, पण तो आजार आणि त्यामुळं होणारा सामाजिक त्रास काही पाठ सोडत नव्हता.

त्या सांगतात, "शेतावर काम करणारे इतर लोक माझ्यापासून फटकून वागू लागले."

"डॉ. आरोळेंना ही गोष्ट कळाल्यावर एक दिवस ते शेतावर आले. सर्व जण जेवायला बसले आणि डॉ. आरोळेंनी मला त्यांच्या ताटात जेवायला बसवलं. माझ्यासोबत काम करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला."

मग डॉ. आरोळेंनी प्रकल्पातील इतरांना समजावून सांगितलं की हा आजार सोबत राहिल्यानं होत नाही. "मग त्या सगळ्यांनी मला स्वीकारलं," रत्ना सांगतात.

"त्यानंतर मी स्वत:ला कामात बुडवून घेतलं. एकेक गोष्ट शिकत गेले. रोपवाटिका तयार करायला शिकले, गांडूळ शेतीचं प्रशिक्षण घेतलं. पोल्ट्री, शेळीपालनाचंही प्रशिक्षण घेतलं. या कामामुळं मी माझं दु:ख विसरून गेले."

ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या कृषी संशोधन केंद्रावर कामगार म्हणून रुजू झालेल्या रत्ना आज या केंद्राच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेळीपालन प्रकल्प चालवत आहे आणि गाई-बैलांचा सांभाळही करत आहे.

एवढंच नाही तर इथे भेटीला येणाऱ्या व्यक्तीला गांडूळ खत प्रकल्पाची माहिती देणं, शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणंही रत्नाची जबाबदारी आहे. सर्व हिशोब त्याच सांभाळतात.

शेतीशिवाय बचत गटांमध्येही रत्ना कार्यरत आहेत. बचत गट चालवणाऱ्या महिलांना त्या मार्गदर्शन करतात.

ज्या लोकांनी रत्ना यांना दूर सारलं तेच सर्वजण आता त्यांना सन्मानानं बोलावतात. नातेवाईक लग्न किंवा इतर कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रित करतात.

पुढे जाऊन रत्ना यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलीला 3 वर्षांची असताना दत्तक घेतलं. आज ती मुलगी अकरावीत शिकत आहे.

रत्ना यांनी केवळ त्यांचंच आयुष्य नाही पालटलं तर आसपासच्या लोकांच्याही त्या प्रेरणास्रोत झाल्या. त्या सांगतात, "HIV-एड्ससह जगणारे लोक आणि त्यांचे नातेवाईक जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मी त्यांना सांगते की, मी HIV असूनही मी स्वत:च्या पायावर उभे राहिले. त्यांचा विश्वास बसत नाही. मग मी माझे मेडिकल रिपोर्ट दाखवते."

"मग त्यांचा विश्वास बसतो, आणि विश्वासही वाढतो की HIVशी संघर्ष करून जगता येऊ शकतं. इतर एड्सबाधितांची, त्यांच्या नातेवाईकांची हिंमत वाढवणं, यामध्ये मला खूप समाधान मिळतं."

रत्ना यांच्या या संघर्षाची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या त्यांच्या वाटचालीची दखल स्वित्झर्लंडमधील जी. आय. सी. ए. एम. या आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं घेतली.

आज 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी रत्ना यांना व्याख्यान देण्यासाठी स्वित्झर्लंडला आमंत्रित करण्यात आलं आहे.

रत्ना सांगतात, "मला हेच मांडायचं आहे की, समाजाने HIV-एड्ससह जगणाऱ्यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. त्यांचा तिरस्कार करू नका. कॅन्सर आणि डायबेटिस यासारखा हाही एक आजारच आहे."

"HIV-एड्ससह जगणाऱ्यांना औषधोपचार तर मिळायलाच हवेत. पण त्यांना रोजगारही मिळायला हवा. स्वत:च्या पायावर उभे राहिले तर ते सन्मानानं जगू शकतात. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे HIV-एड्ससह जगणाऱ्यांच्या मुलांना दूर सारू नका," असं त्या सांगतात.

स्त्रोत- अभिजीत कांबळे, BBC News Marathi

*रत्नाताई च्या दुर्दम्य ईच्छाशक्ती ला ऊत्तुंग भरारीला सलाम..*

   *त्यांच्या मध्ये जगण्याची ऊमेद जागवणार्या डाँ आरोळे यांना साष्टांग दंडवत.....*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_