twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣1⃣

*लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांची वाडी*

🖋विलास शिंदे 12/09/2018

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी कर्नाटकात गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धारवाड व कलादगी येथे झाले. त्यांनी घरच्यांच्या विरोधास न जुमानता चित्रकलेच्या अभ्यासक्रमाला मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस येथे प्रवेश घेतला; दोन वर्षें अभ्यासही केला. मात्र त्यांनी त्यांना त्या क्षेत्रात पुढे रंगांधळेपणामुळे जाता येणार नाही हे लक्षात येताच यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण होताच ‘जिजामाता संस्थे’मध्ये बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. त्यांना उपकरणे खोलून पुन्हा जोडण्याची सवय होती. त्यामुळे ते केवळ शिक्षकी पेशात रमले नाहीत. त्यांनी 1887 मध्ये मुंबईतून सायकली खरेदी करून त्या बेळगावमध्ये वडील बंधू रामण्णा यांच्या मदतीने विकण्यास सुरूवात केली.

त्यांनी इंग्लंडच्या मूळ सायकल उत्पादक कंपनीशी थेट करार केला. दरम्यान, त्यांना भारतीय म्हणून शिक्षण संस्थेत पदोन्नती नाकारली गेली आणि लक्ष्मणराव नोकरीचा राजीनामा देऊन बेळगावला आले. त्यांनी भावासह ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ अशी कंपनी स्थापन केली. त्यांनी काही वर्षें विविध उद्योग केले. परदेशातून पवनचक्क्या आणूनही विकल्या. ते  लोकांना सायकल चालवण्यास शिकवायचे. त्यांनी लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे करून विकले. दरम्यान, त्यांनी औंध संस्थानिकांच्या घरातील कुलदैवताच्या मूर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंगने मुलामा चढवून देण्याचे काम करून दिले.

त्यांनी भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याचे ठरवले. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. जनावरांच्या चाऱ्यातून बुडखा वेगळा करणे आणि चाऱ्याचे बारीक तुकडे करून ते जनावरांपुढे टाकणे सोपे झाले. ते यंत्र लोकांच्या पसंतीस उतरले.

त्यांनी स्वत:ची कार्यशाळा उभारली. त्यांनी लोखंडाचे ओतीव नांगर बनवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जागा व भांडवल, दोन्हीची गरज भासू लागली. औंध संस्थानने त्यांना दहा हजार रूपये आणि बत्तीस एकर जमीन देऊ केली. ती जागा म्हणजे संस्थानातील कुंडल या गावाजवळील ओसाड जमीन होती. जमिनीवर निवडूंग आणि सराटा यांचे साम्राज्य. लक्ष्मणरावांनी त्यांचा उद्योग त्या सलग जमिनीवर उभा केला. अडचणी अनंत होत्या. त्यांनी तरीही तेथे एक उद्योगनगरी उभी केली. तो परिसर किर्लोस्करवाडी म्हणून ओळखला जातो. ‘उद्यम नगरी’ किर्लास्कर वाडी!

तिच्या उभारणीचे काम 1910 साली सुरू झाले. ती औद्योगिक वसाहत जमशेदपूरनंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची होती. बिहारमध्ये जमशेटजी टाटा यांच्या पोलाद कारखान्याचे जमशेदपूर उभारले गेले. त्यानंतर कै लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून  ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला.

लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. बेळगावहून येणारी जुनी यंत्रे आणि साहित्य कारखान्याच्या स्थळी आणली गेली. कारखाना उभारणीच्या काळात उघड्यावर स्वयंपाक आणि झोपण्यास धर्मशाळा असा सर्व प्रकार होता. कारखान्यात जातिभेदाची दरी तेथूनच मिटण्यास सुरूवात झाली. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली आणि एकसंध साथीदारांची टीम त्यातून तयार झाली. निवारा, पाणी, अनंत अडचणी! मात्र निर्धार पक्का होता. हळुहळू उद्योग उभारत गेला आणि उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला, रेल्वे लाइनच्या गळतीचे पाणी गोळा करून आणले जात असे. नंतर एका शेतकऱ्याच्या विहिरीवरून गाडीतून पाणी आणले जाई. त्यानंतर पाईपलाइनने पाणी आणून एका हौदात सोडले जाई. तेथून कामगार पाणी भरत. पांढऱ्या मातीच्या विटा पाडून घरे बांधून झाली. उत्पादन सुरू झाले. मात्र संकटे काही संपत नव्हती. त्यावर्षी जोरात पाऊस झाला आणि पांढऱ्या मातीत बांधलेली अनेक घरे पडली. कामगार बेघर झाले. पांढऱ्या मातीऐवजी लाल मातीतील विटा पाडणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी लाल मातीची जमीन विकत घेणे आवश्यक होते. त्यासाठी खर्च येणार होता.

लक्ष्मणरावांकडील गंगाजळी संपत आली. पुन्हा पंतप्रतिनिधींकडे पैसे मागण्यास मन तयार होईना. तेव्हा स्नेही रामभाऊ गिडे यांनी दहा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. लक्ष्मणरावांनी कारखाना सुरू केला. नांगराचे उत्पादन सुरू झाले. रब्बीच्या पिकानंतर मशागतीचा हंगाम आला आणि नांगराची विक्री जोरात सुरू झाली. नांगर भाड्याने देणे हाही फायद्याचा धंदा आहे हे काही चाणाक्ष मंडळींनी हेरले आणि मालाला उठाव मिळाला.

किर्लोस्करवाडीत सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे ‘पंप म्हणजे किर्लोस्करांचे’ अशी ख्याती झाली. किर्लोस्करांनी त्यांच्या उत्पादनांचा पसारा पुढे वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तेथे सुरू झाली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाची यातायात करावी लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. त्यांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या आणि जणू एक गावच वसवले! मोठाले रस्ते, टुमदार प्रशस्त घरे, स्वच्छता व कर्मचाऱ्यांसाठी उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. त्यामुळे उद्योगाची भरभराट झाली.

लक्ष्मणरावांनी त्यांच्या नांगराच्या मूळ रचनेत बदल करून अधिक चांगला नांगर बनवला. त्यातच 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि कच्चा माल, त्यातही लोखंड मिळेनासे झाले. त्यावर उपाय म्हणून विनावापर पडून असलेले लोखंडी साहित्य वितळवून नांगर बनवण्याचे कार्य सुरू ठेवले. रंगांचा कारखाना काढला. उद्योगाचे भाग भांडवल 1918 पर्यंत पाच लाख रूपये झाले. कंपनी शेअर मार्केटमध्ये उतरली. किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची निर्मिती हे त्यांचे आणखी मोठे साध्य. एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली. ती इंग्लंडच्या ऑईल कंपनीबरोबर करार (1920) करणारी पहिली भारतीय कंपनी. त्यातून ऑईल इंजिनचे उत्पादन सुरू झाले. त्या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या हृदयावर कोरले गेले. कंपनी ऑईल इंजिन परदेशी निर्यात 1946 पासून करू लागली. त्यांचे चिरंजीव शंतनुराव ‍यांनी शिक्षण संपताच कंपनीच्या कार्यामध्ये लक्ष घातले. कंपनीचे भागभांडवल 2018 साली अडीच अब्ज डॉलर इतके आहे.

लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935 मध्ये नेमण्यात आले. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने 1969 मध्ये त्यांच्यावर पोष्टाचे तिकीट काढले.  शेती पिकावी, शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आयुष्यभर कार्य करणाऱ्या त्या उद्योजकाचे 26 सप्टेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांनी कृषी उपकरणांच्या उत्पादनात उभारलेली कंपनी जगातील ऐंशी देशांत योगदान देत आहे.

‘किर्लोस्करवाडी’ हे स्टेशन मध्य रेल्वेवर बनले आहे. तेथे प्रवाशांप्रमाणे मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. किर्लोस्करवाडी मराठी मनाचा काही काळ मानबिंदू बनून राहिली आहे.

🖋- विलास शिंदे

vilasshindevs44@gmail.com

(शेतीप्रगती, ऑगस्ट 2018 वरून उद्धृत)

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣8⃣

*📜राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने यंदा गौरवल्या जाणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाने बंडगरवस्तीतल्या शाळेत नेमकं काय केलं त्याची एक रंजक गोष्ट.*

_अहमदनगर जिल्ह्यातील बंडगरवस्ती़ डोंगरावर वसलेलं आणि जेमतेम दीडशे लोकवस्तीचं हे गाव. शाळाही फक्त चौथीपर्यंत. पण इथल्या शाळेत शिकवणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाला येत्या शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे पाड्यावरच्या या शाळेत त्यांनी असं काय केलं, मुलं स्वत:हून कशी शिकायला लागली, त्याची ही रंजक कहाणी._

    🖋 *_साहेबराव नरसाळे_*

        बंडगरवस्ती़ अहमदनगर जिल्ह्यातील हंडाळवाडी (तालुका कर्जत) या दुर्गम गावातील जेमतेम दीडशे लोकसंख्येची वस्ती़ या बंडगरवस्तीत उंच टेकडीवरची शाळा़ पांदीपांदीतून मार्ग काढीत शाळेत पोहोचलो त्यावेळी चार जणांचा एक गट कॅरम खेळत होता़ एकजण कॅरमची सोंगटी मारतो आणि वहीवर आकडे टिपतो़ पुन्हा दुसरा खेळतो आणि आकडे टिपतो़ शेजारीच दुस-या एका गटाने सापसिडीचा खेळ मांडलेला़ एका कोप-यात लॅपटॉपवर एक मुलगा टायपिंग शिकतोय तर त्याच्याच शेजारी बसलेली मुलगी शैक्षणिक व्हिडीओ पाहतेय़़. 

        याच शाळेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक विक्रम अडसूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आह़े राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून पात्र ठरलेले ते एकमेव़ त्यांची शाळा, शिकविण्याची पद्धत अन् मुलांमध्ये मूल होऊन खेळण्याची त्यांची वृत्ती मुलांनाही आपसूक त्यांच्या आनंददायी शिक्षणाच्या खेळात ओढून घेत़े.

त्यांची शाळा पाहण्यासाठी मी अहमदनगरहून सुमारे 80 किलोमीटरचा प्रवास करून हंडाळवाडीत पोहोचलो़ हंडाळवाडीतून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर बनगरवाडी आह़े बनगरवाडीच्या दक्षिणेला डोंगरावर ही शाळा आह़े ‘डोंगरांमध्ये दूरवर पसरलेल्या हनुमाननगर, बिडगरवस्ती, पारखेवस्ती, भिसे वस्ती, हंडाळवस्ती या वस्त्यांमधून मुले बंडगरवस्ती शाळेत येतात़ या शाळेची पटसंख्या आहे २८, येथील सर्व मुलं मेंढपाळांची़ पावसाळ्यात हे मेंढपाळ घराकडे येतात आणि पावसाळा संपला की मेंढय़ा घेऊन भरकटतात गावोगाव़ अख्खं कुटुंबच पाठीवर घेऊन रानोमाळ भटकंती करणा-या समाजाची ही मुलं.  ही मुलं शिकली पाहिजेत, शहाणी झाली पाहिजेत, समाजाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजेत, यासाठी अहोरात्र कष्टणारी कविता बंडगर आणि हसत-खेळत मुलांमध्ये शिक्षणाचे बीज अंकुरणारे विक्रम अडसूळ, यांची ही द्विशिक्षकी शाळा़ इथल्या चौथीपर्यंतच्या आनंददायी प्रवासाची वाट मोठी खडतर आह़े दगडधोंडे, काट्याकुपाट्याचा रस्ता तुडवीत ही मुले शाळेत येतात़ पावसाळ्यात चिखलाने माखतात़ या मुलांच्या पायात रुतलेला काटा काढण्यापासून ते चिखलाने माखलेल्या मुलांचे कपडे स्वच्छ करण्यापर्यंत हे शिक्षकद्वयी काम करतात़ म्हणूनच सरांना मुलं घरून आणलेली बाजरीची भाकरी आणि ठेचा आग्रहाने खाऊ घालतात़ सरांवर प्रेम करतात़.

‘मुलं शिकली पाहिजेत, टिकली पाहिजेत, हा अडसूळ सरांचा उद्देश़ म्हणूनच त्यांनी वेगवेगळे प्रयोग केल़े कोणत्याही सुविधा नसलेल्या या शाळेत त्यांनी सर्व सुविधा आणल्या़ लॅपटॉप, टॅब अशी आधुनिक साधनेही मुलांच्या हाती दिली़ मुले त्यांचा वापर करू लागली़ इतर राज्यातील अनेक शाळांमधील मुलांशी या शाळेतील मुलं संवाद साधू लागली़ एव्हढेच नव्हे तर परदेशातीलही काही शाळांशी या दुर्गम मुलांनी थेट संवाद साधला़. 

महाराष्ट्रात 2014 साली ज्ञानरचनावादाचा बोलबाला झाला़ पण बंडगरवस्ती शाळेत 2013 पासूनच ज्ञानरचनावाद पद्धतीने मुलांना शिकविले जात होत़े .

ज्ञानरचनावादाचा विषय येताच अडसूळ म्हणाले, ज्ञानरचनावाद म्हणजे कृतिशील स्वयंअध्ययऩ यात मुलांनी स्वत: कृतीतून शिकायचे असते आणि शिक्षकांनी त्यांना शिकण्यास मदत करायची़ एव्हढी सोपी ही पद्धत आह़े आम्ही मुलांना विविध शैक्षणिक साहित्य देतो़ मुलं खेळत-खेळत शिकतात़ यातून दोन उद्देश सफल होतात. एक म्हणजे खेळाचा आनंद मुलांना मिळतो आणि आपोआप मुलांचा अभ्यासही होतो़ .

मी शाळेत पोहोचलो तेव्हा मुले गणिती कॅरम खेळत होत़े एका सोंगटीवर लिहिलेला आकडा पुसला होता़ ही बाब मुलांनी सरांच्या लक्षात आणून दिली़ क्षणाचाही विचार न करता अडसूळ यांनी हातात कात्री घेतली़ कराकर एक कागद कापला़ त्यावर तो आकडा लिहिला आणि त्या सोंगटीवर गोलाकार पद्धतीने चिकटवलाही़ मुलांचा खेळ पुन्हा सुरू झाला़  अशाच पद्धतीनं मुलं शिकतात. शिकण्याची त्यांना गोडी लागते. त्याचा त्यांना जाच वाटत नाही.

विविध शैक्षणिक साहित्याची निर्मितीही त्यांनी केली आह़े हसत खेळत शिक्षण यावर अडसूळ सरांचा भर आहे आणि त्यामाध्यमातूनच त्यांनी आडवळणाच्या या गावातल्या, येथील मुलांच्या शिक्षणात, त्यांची समज वाढवण्यात खूप मोठा वाटा उचलला आहे. अशा प्रकारे मुलांना शिक्षण मिळालं तर ती नुसती आनंदानं शिकणारच नाहीत, तर शाळाबाह्य मुलंही फारशी दिसणार नाहीत.  

*शाळेचा प्रवास*

बंडगरवस्ती शाळेची सुरुवातही मोठी रंजक आह़े कविता बंडगर या हंडाळवाडीत दहावी शिकलेल्या एकमेव़ दहावीनंतर त्यांचे लग्न शेजारच्या बंडगरवस्ती येथील मुलाशी झाल़े लग्नानंतर कविता बंडगर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल़े त्यांनी बंडगरवस्तीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यांना वस्तीवर विरोध झाला़ हा विरोध झुगारून त्यांनी 2001 साली शाळा सुरू केली़ ज्या खोलीत शाळा भरायची, तेथून त्यांना बाहेर पडावे लागल़े शाळा उघड्यावर आली़ पण त्यांनी हार मानली नाही़ मुलांना झाडाखाली बसवून त्या शिकवू लागल्या़ पुढे त्यांची तळमळ, मुलांमध्ये आलेली हुशारी पाहून सरपंचांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेसाठी एक छोटी इमारत दिली़ शासनाच्या आदेशाप्रमाणे या शाळेला वस्तीशाळेचा दर्जा मिळाला़ कविता बंडगर विनावेतन तेथे शिकवत होत्या़ 2008 साली या शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा मिळाला अन् सुमारे आठ वर्ष सावित्रीच्या लेकीने केलेल्या संघर्षाला यश आल़े 2009 साली विक्रम अडसूळ हे उपक्रमशील शिक्षक आंतरजिल्हा बदलीद्वारे या शाळेत आल़े 2009 पर्यंत अडसूळ पारुंडी (ता़ पैठण, जि़ औरंगाबाद) येथील शाळेत होत़े त्या शाळेचा कायापालट करून ते बंडगरवस्ती शाळेत दाखल झाले होत़े त्यावेळी ग्रामपंचायतने दिलेल्या एका खोलीत शाळा भरत होती़.

जुना वर्ग मुलांना पुरेसा ठरत नव्हता़ त्यामुळे कविता बंडगर आणि विक्रम अडसूळ या शिक्षकद्वयींनी इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा सुरू केला़ सरकार निधी द्यायला तयार होत़े पण जागा नव्हती़ गावकरी शाळेसाठी जागा द्यायला तयार नव्हते आणि ग्रामपंचायतकडे पुरेशी जागा नव्हती़ शेवटी कविता बंडगर यांनीच आपली सुमारे आठ गुंठे जागा शाळेला दिली आणि प्रश्न सुटला़ शाळेच्या बांधकामासाठी निधी मिळाला़ काम सुरू झाल़े पाया खोदण्यापासून इमारत उभी राहीपर्यंत दोघेही श्रमत राहिल़े कधी लोखडांची गाडी शाळेपर्यंत आणण्यासाठी तर कधी विटा पोहोच करण्यासाठी़ दरम्यान कविता बंडगर यांनी पत्राद्वारे डी़एड़चे शिक्षण पूर्ण करून घेतल़े त्या सहयोगी शिक्षिका म्हणून तेथेच रुजू झाल्या़. 

*हसत खेळत शिक्षण*

*गणिती कॅरम -*  गणिती कॅरम खेळ मुलांना हसत-खेळत गणित शिकवतो़ त्यांना गणिती आकडेमोड करण्याची आवड लागत़े हा खेळ गटात खेळल्यामुळे ज्या मुलाला गणिती क्रिया येत नाही किंवा ज्याचे गणित चुकते त्याला इतर मुले मदत करतात. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार मुले आनंदाने करतात़.

*गणित शिडी -* सापशिडी हा मुलांच्या आवडीचा खेऴ त्याच पद्धतीने गणित शिडी हा खेळ आह़े हा खेळ चार जणांमध्ये खेळला जातो. यातील सोंगटीवर आकडे असतात़ ते वाचून मुलांनी पुढील घरात ठेवायच़े यातून मुलांना आकडे ओळख होते आणि संख्यामापन ते अचूक करू लागतात़ .

*शब्दडोंगर -* यामध्ये मुलांना एक शब्द सांगितला जातो़ त्या शब्दाच्या अनुषंगाने मुले त्यांच्या मनात येईल ते लिहितात़ यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होऊन मुले विचार करू लागतात. त्यांच्या विचारांना चालना मिळून लेखन क्षमता विकसित होते.

*शब्दबँक -* या उपक्रमामध्ये मुलांची शब्दसंपत्ती वाढवली जाते. शनिवारी दप्तरमुक्त शाळा असते. मुलांना वाचनालयातील पुस्तके वाचायला देऊन त्यातील नवीन शब्द शोधून त्यांना ते एका ठिकाणी संकलित करायला सांगितले जात़े नंतर ते मुलांच्या मदतीने कार्डशिटवर लिहून त्याचे संकलन डब्यात केले जात़े वेळेनुसार पुन्हा त्या शब्दांचे लेखन व वाचन करून मुले त्यांची शब्द साठा वाढवतात़.

*कलेतून शिक्षण -* मुलांना एखादा पाठ शिकविल्यानंतर त्याचे नाट्यीकरण केले जात़े विषयानुसार मुलेच त्यांचे संवाद ठरवतात़ पात्रेही तेच निवडतात़ नंतर मुले संभाषण करतात. यामध्ये प्रमाणभाषेचे बंधन नसते. त्यामुळे मुले आपल्या बोलीभाषेतून चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. आशय समजून घेण्यासही त्यामुळे मदत होते.

*(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़ेत.)*

sahebraonarasale@gmail.com

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..