twitter
rss

वार - मंगळवार

🌄 दिनांक - 31/01/2017


🎯 आजच्या शैक्षणिक बातम्या 🎯


-----------------------------------------------
साभार -Online पुढारी, लोकसत्ता,म.टा.,सकाळ.

-----------------------------------------------

संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली

-----------------------------------------------
'                      
📚मराठी साहित्याला ई-बुक्सची साथ..

मराठीतील दुर्मीळ आणि नवीन पुस्तके आता ई-पुस्तकांच्या स्वरूपातही वाचता येणार आहेत.

प्रतिनिधी, मुंबई | January 31, 2017 3:15 AM


सहा मराठी प्रकाशकांची पुस्तके ‘मराठी रीडर’अ‍ॅपवर

मराठीतील दुर्मीळ आणि नवीन पुस्तके आता ई-पुस्तकांच्या स्वरूपातही वाचता येणार आहेत. किंडल आणि ई-बुक रिडर्सचा वापर वाढला तरी  चांगली मराठी पुस्तके ई-पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत, याची अशी खंत वाचकांकडून गेल्या काही वर्षांत व्यक्त केली जात होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर’ नावाने वाचनाचे व्यासपीठ खुले केले आहे. मौज, राजहंस, ज्योत्स्ना, पॉप्युलर, रोहन, कॉन्टिनेन्टल या मराठीतील सहा नामांकित प्रकाशनांनी आपली पुस्तके ‘मराठी रीडर’ या अ‍ॅपवर वाचण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी ‘मराठी रीडर’  अ‍ॅपसाठी अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलमधील प्ले-स्टोअरमधून ‘मराठी रीडर’ (marathireader) नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.  त्यावरील नोंदणीवरून   पुस्तकांच्या यादीत देण्यात आलेली पुस्तके मिळविता येतील. सध्या ‘मराठी रीडर’मध्ये १२५ पुस्तके असून यात मर्ढेकरांची कविता, असा बालगंधर्व, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, अंधारातून प्रकाशाकडे यांसारखी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. डाऊनलोड केलेल्या पुस्तकातील अक्षरांचा आकार वाढवता आणि कमी करता येणार आहे. मराठी रीडर अ‍ॅपबरोबरच ई-पुस्तकांसाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मराठी रीडर’चा वापर करीत असताना पडलेले प्रश्न किंवा समस्या वाचकांनी संकेतस्थळावर टाकावीत. या सूचनांच्या मदतीने ई-पुस्तक प्रणालीत बदल करता येणे शक्य होईल, असे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. डोंबिवली येथील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी ‘मराठी रीडर डॉट इन’ या ई-पुस्तकाची अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्या वेळी २७९ स्टॉलवर ई-पुस्तकाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. मराठी पुस्तकांना मागणी नाही, अशी ओरड सुरू असली तरी समाजमाध्यमांवरील संदेश, माहिती वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर मराठी पुस्तके मोबाइलवर उपलब्ध झाली तर ई-पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी व्यक्त केला.




जाहिरातींमुळे रसभंग नाही!

मराठी रीडर अ‍ॅप्लिकेशनचा वापर करताना किंवा यावर पुस्तक वाचत असताना जाहिराती नसल्यामुळे वाचकांचा रसभंग होणार नाही याची काळजी हे अ‍ॅप तयार करताना घेण्यात आली आहे.


तीन डिव्हाइसमध्ये वापर

मराठी रीडरमधून डाऊनलोड केलेले पुस्तक तीन डिव्हाइस म्हणजे एकाच वेळी घरातील तीन माणसांना वाचता येईल. त्यासाठी पुन्हा पुस्तक खरेदी करावे लागणार नाही. यासाठी वाचकाने आपला नोंदणी क्रमांक दुसऱ्या डिव्हाइसमध्ये घालावा. मोबाइलमधून पुस्तक काढून टाकल्यावर पुन्हा ते पुस्तक डाऊनलोड करताना पैसे भरण्याची गरज भासणार नाही.


प्रकाशकांनी सहभागी व्हावे!

सध्या मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन सुरू केलेले मराठी रीडर अ‍ॅप्लिकेशन अधिक व्यापक होण्यासाठी इतर प्रकाशकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जोत्स्ना, मौज, रोहन, कॉन्टिनेंटल, पॉप्युलर, राजहंस या प्रकाशकांनी केले आहे. अधिक प्रकाशकांच्या सहभागामुळे मराठी रीडर ई-पुस्तकात विविध विभागातील पुस्तकांचा समावेश करणे शक्य होईल, असे प्रकाशकांनी सांगितले.


ई-पुस्तकांवर २५ टक्के सवलत

मराठी रिडरवरील पुस्तकांवर २५ टक्क्य़ांची सवलत देण्यात आली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ५० टक्क्य़ांची सवलत देण्यात आली आहे.


पुस्तकांची टिपणं काढायची संधी

पुस्तक वाचत असताना महत्त्वाची वाक्ये किंवा टिपण संदर्भ म्हणून हवा असल्यास तो मराठी रीडरवर जतन करता येईल. हे सर्व संदर्भ एकाच पानावर वाचणेही शक्य आहे. त्याशिवाय महत्त्वाचे संदर्भ ‘हायलाईट’ किंवा वेगळ्या रंगाने गडद करता येणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃                      
🌾 मराठी शाळा बंद करण्यासाठी दबाव

By pudhari | Publish Date: Jan 30 ,2017

मुंबई : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील कित्येक वर्ष विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या मराठी शाळा बंद करण्यासाठी दबाव आणला जात असून या विरोधात राज्यातील मराठी शाळा चालक न्यायालयीन लढा देण्याच्या तयारीत असल्याचे रविवारी मुंबईत झालेल्या एका परिषदेत स्पष्ट झाले.

शिक्षणहक्क सन्मवय समिती, मराठी अभ्यास केंद्र व पंचतत्व सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाळांच्या प्रश्‍नांवर मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जे.पी.नाईक सभागृहात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शालेय शिक्षण विभागाच्या धोरणावर अनेक मराठी शाळाचालकांनी टीका केली. शालेय शिक्षण विभागातील अधिकारी इंग्रजी शाळांना वेगळा न्याय आणि मराठी शाळांच्या विरोधात आणि पोलिसी कारवाईचा धाक दाखवून वरवंटा फिरवण्याचे काम करीत असल्याचा आरोपही संस्थाचालकांनी यावेळी केला.

राज्यभरातील स्वयंअर्थसाहाय्यित मराठी शाळा, बृहद् आराखड्यासंदर्भातील बाधित शाळा, विनाअनुदानित मराठी शाळा याबाबतचे कळीचे प्रश्‍न परिषदेत उचलून धरण्यात आले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना हा कायदाच अद्याप कळला नाही. गेल्या पाच वर्षापूर्वी आरटीई कायद्यातील काही कलमांचा आधार घेत पुण्यातील काही मराठी शाळा बंद करण्यास शालेय शिक्षण विभाग सरसावला होता. त्यावेळी पुण्यातील मराठी शाळा चालकांनी एकत्र येत हा प्रयत्न हाणून पाडला. आताही हेच शालेय शिक्षण विभागाचे सुरु असून गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या मराठी शाळा संस्थाचालकांनी विनाअनुदानित तत्वावर चालू केल्या आहेत. त्या शाळांत मराठी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. अनुदानाची मागणी करुनही या शाळांना अनुदान मिळत नाही. तरीही अशा प्रकारच्या शाळा सुरु आहेत. मात्र या शाळांना कायद्यातील कलमांचा चुकीचा अर्थ काढून परिपत्रक पाठवले जात आहे. या शाळा अनाधिकृत म्हणून कारवाई करण्याचे परिपत्रकात म्हणतात मात्र आरटीई कायद्यात या शाळा अधिकृत कराव्यात असे असूनही याकडे सरकार डोळेझाक करत आहे. या विरोधात आता न्यायालयीन लढाईला सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे तरच मराठी शाळा वाचतील असेही पानसे म्हणाले.

मराठी शाळांसाठी बृहद्आराखडा तयार करण्यास सांगितला, मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या झाली नाही यामुळे मराठी शाळांचे अस्तित्वाचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत असे रवींद्र धनक म्हणाले. सरकारने राज्यभरात मराठी स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मान्यता दिली असली तरी तिथेही मराठी शाळांबाबत दुजाभाव केला जातो. शालेय शिक्षण विभागातील अधिकारी या शाळांना त्रास देतात, शिक्षकांना शाळा सोडून अशैक्षणिक कामे दिली जातात. अशी तक्रार संस्थाचालक ज्ञानेश्‍वर जाधव यांनी केली.

संस्थाचालक राजेश प्रधान यांनी मराठी शाळांचे प्रश्‍न विशद केले. शिक्षण हक्क कायद्यात नमूद केल्याप्रमाणे अनेक शाळांत शिक्षक नाहीत. गेले कित्येक वर्ष शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची भरती नाही. शिक्षकांची संख्याही अनेक ठिकाणी कमी आहे. याचा विचार न करता संचमान्यता आणि समायोजनही नीट झालेले नाही. त्यामुळे शालेय शिक्षणात प्रामुख्याने मराठी शाळांची अवस्था बिकट करण्याकडे सरकारच जबाबदार असल्याचे दिसून येते, असे सांगितले.

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी प्रास्ताविकात मराठी शाळांसाठी हा लढा असल्याचे नमूद करत, राज्यातील मराठी शाळांचे प्रश्‍न एकत्र करुन यासंदर्भातील पाठपुरावा राज्य सरकारकडे करण्यात येईल असे सांगितले. डॉ.वीणा सानेकर   यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃