twitter
rss

गरजूंपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवणारे शिक्षक


नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकांनी केलेल्या संस्कारांवरच विद्यार्थ्यांची जडणघडण अवलंबून असते, असे म्हणतात. अर्थात, हे शिक्षक म्हणजे चार भिंतींत शिकवणारे एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर भिंतीबाहेरही अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदान करणारे शिक्षकही तितकेच आपल्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. आदिवासी भागात, खेड्यापाड्यांत, तसेच रात्रीच्या शाळेत, रस्त्यावरच्या दिव्याखाली वंचितांना, गरजूंना शिक्षण देणारे शिक्षक हे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत. अशाच काही आदर्श शिक्षकांचा येथे उल्लेख करता येईल.


*कोरकूंच्या लेकरांसाठी*

कोरकू आदिवासींच्या मुलांमध्ये शाळा सोडण्याचे आणि शाळेत न जाण्याचे प्रमाण मोठे आहे. ही मुले असे का करतात, याचा शोध ‘उन्नती इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड एज्युकेशनल चेंज’ या संस्थेने घेतला. त्यांना कारण सापडले. कोरकू मुलांची मातृभाषा कोरकू आणि शिक्षणाची भाषा मराठी. या मराठीचीच त्यांना भीती वाटते. ती घालवण्यासाठी देशमुख महिन्यातून दोनदा अकोल्याला जातात. तिथल्या कोरकू मुलांना मराठीचे धडे देतात. गोरेगाव येथील दी शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत प. बा. सामंत शिक्षण समृद्धी प्रयास हे केंद्र चालवण्यात येते. त्याच्या प्रमुख म्हणून त्या काम पाहतात.


*गरीब विद्यार्थ्यांना आधार*


शिक्षणाचे खासगीकरण झाल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून गरिबांची मुले दुरावली गेली. अशा वंचितांना आपल्या नोकरीतून मिळालेला पैसा आणि शिक्षक नसताना, केवळ ज्ञानाच्या आधारावर उच्चशिक्षित करण्याचा ध्यास जोपासून काकाजी हट्टेवार यांनी भगीरथ होत त्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याचे महनीय कार्य केले. त्यासाठी कुठलीही मदत मदत न घेता ‘स्ट्रीट लाइट’च्या प्रकाशाखाली विद्यार्थ्यांचे आयुष्य उजविले आहे. काकाजी हट्टेवार हे रिझर्व्ह बॅंक ऑफिसमध्ये कार्यरत असताना, त्यांनी सुरवातीला घरीच मुलीला शिकविण्यास सुरवात केली. याचवेळी त्यांच्याकडे परिसरातील दोन ते तीन गरीब मुले शिकायला यायची. तीस वर्षांनंतर आज या टीममध्ये ४० तरुण जवळपास ३०० मुलांना शिकवितात. पावसाळ्यात स्ट्रीट लाइटखाली बसता येणे शक्‍य नसल्याने ऑक्‍टोबर महिन्यापासून क्‍लासेसला सुरवात होत असल्याचे या टीममध्ये शिकणाऱ्या योगेश पाचपोर याने सांगितले.


*गरिबांनी शिकावे म्हणूनच धडपड*

चांगली परीस्थिती असली तर प्रत्येक पालक आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत शिकवतो; परंतु गरजूंनीही शिक्षण घ्यावे, यासाठी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकणे महत्त्वाचे आहे, या विचाराने वसंतराव एकबोटे हे महापालिका शाळांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करतात. मायको कंपनीतून अधिकारीपदावरून निवृत्त झालेले व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते असलेले एकबोटे यांचा केवळ सेवाभावी उद्देश तर आहेच; सोबत सामाजिक चळवळ उभारण्याचे कामदेखील ते करतात. एखाद्या शाळेत शिकवायला शिक्षक नसतील तर एकबोटे व सहकारी अध्ययनाचे कार्य करतात. शिक्षकी पेशा नसतानाही राष्ट्र सेवा दल व शिक्षण
बाजारीकरणविरोधी मंचच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देतात.


*संगीत शिक्षण विशेष मुलांसाठी...!* 

संगीत, व्हाइस ओव्हर अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सविता कबनूरकर या अंध, अपंग, मतिमंद अशा विशेष मुलांसाठी गेली दहा वर्षे संगीत शिक्षण देत आहेत. स्वतःच्या स्वरमयी संगीत क्‍लासेसमधून त्या विद्यार्थी घडवतात. मात्र, त्यापलीकडची संगीतसेवा करताना त्यांनी दहा वर्षांपूर्वी अशा विशेष मुलांच्या शाळांत जाऊन शिक्षणाचा संकल्प केला. आठवड्यातील किमान काही दिवस त्यांनी या कामासाठीच खर्च करायचे ठरवले. अंध मुलांना किमान ताल-सूर चटकन समजतात; मात्र मतिमंद मुलांना एकदा म्हटलेले गाणे पुढच्या वेळी आठवेलच, असे नाही. या पार्श्‍वभूमीवर सविता यांनी संयमाने ही जबाबदारी पेलली आणि अनेक विद्यार्थी घडवले. त्याचमुळे चेतना मतिमंद मुलांच्या शाळेचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचं पान ठरलं आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   

गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली