twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣5⃣

*👩🏻 नवरात्र विशेष 👩🏻*

*रोजंदारीतून रोजगार देण्यापर्यंत...!*

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मातीची ओढ आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नाठाळ जमिनीतून सोने पिकवता येतं, हे साधी अक्षरओळखही नसणाऱ्या जालन्यातल्या सीताबाई मोहितेंनी दाखवून दिले आहे. आवळ्याच्या औषधी गुणधर्माचे महत्त्व पटवून दाखवत जळगावमधल्या सीताबाईं मोहिते यांनी स्वतः शून्यातून धडाडीने व्यवसाय उभा केला आहे. स्वतःच्या संसाराला हातभार लावत असताना निरक्षर असलेल्या सीताबाई अनेक महिलांच्या खंद्या आधार झाल्या आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापनामध्ये धडे गिरवणारे विद्यार्थीही सीताबाईंच्या लघुउद्योगताले मार्केटिंगचे तंत्र शिकून घेण्यासाठी मानाने त्यांना प्रशिक्षण शिबिरे घेण्यासाठी बोलावतात. थँक्यू, सॉरी हे अवघे दोन इंग्रजी शब्द माहीत असलेल्या मोहितेबाईंनी आत्मविश्वासाच्या जोरावर सहज परदेशी वारी करून लक्ष्मी, सरस्वती, दुर्गारूपाची जणू चुणूकच त्यांच्या कामातून दाखवून दिली आहे.
सीताबाई जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या. घरात शिक्षणाचा गंध कुणालाच नाही. पण मातीवर, शेतीवर सगळ्याचा जीव. शेतीतून उत्पन्नाचे फारसे साधन नसल्याने सीताबाई व त्यांचे पती रोजंदारीवर अनेक वर्ष दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून राबत होते. शेतमळ्यांची राखण करताना सीताबाईंच्या मनात स्वतः खपून मातीतून काही मिळवावे, त्यातून स्वतःसारख्या काबाडकष्ट करणाऱ्या चारचौघींना रोजगार मिळवून द्यावा, ही इच्छा सतत धडका मारत होती. २००३मध्ये रोजंदारी सोडून त्यांनी कसेबसे २०० रुपये भांडवल गोळा केले, त्यातून आवळा कॅन्डी बनवायला सुरुवात केली. पाव
किलो, अर्धा किलो अशी आवळा कॅन्डी घेऊन त्या शाळेच्या बाहेर विकायला बसत, हळुहळू या घरगुती आवळा कॅन्डीच्या उत्कृष्ट चवीची चर्चा गावभर झाली, अन् सीताबाईंच्या कॅन्डीची मागणीही वाढत गेली. सहा-सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या नावाने त्यांनी बचत खाते उघडले. उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कर्ज मिळाले असले तरीही छोट्या कमाईतून त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न होताच. त्यावरही सीताबाईंनी पतीच्या मदतीने तोडगा शोधून काढला. जालन्यातल्या अनुसूया रोपवाटिकेतून आवळे घेऊन कच्च्या मालासाठी शोध सुरू ठेवला. कॅन्डी बनवण्यासाठी मशिन घेऊन सिंदीकाळेगाव येथे छोटी फॅक्टरी बांधली. त्यात पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यामध्ये या पाण्यावर शेती करायला सुरवात केली. जालनाच्या कृषी विज्ञान केंद्रातून शेतीविकासाचे प्रशिक्षण घेत आवळ्याच्या चौदा प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती सुरू केली. आवळा गुलाब गुलकंद, ज्यूस, सुपारी, कॅन्डी अशा उत्पादनांच्या निर्मितीसाठी आता त्यांनी त्यांच्यासारख्याच गरजू, कष्टाळू महिलांची मदत घेऊन या उद्योगाचा विस्तार केला आहे.

बचतगटाच्या माध्यमातून गावातल्या निरक्षर महिलांना उद्योजिकता, आर्थिक साक्षरता, आत्मभानही मिळवून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत त्यांना ८८हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लघुउद्योगातून अनेकींना प्रेरणा देणाऱ्या सीताबाईंना नुकतेच आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानचाही पुरस्कार मिळाला आहे. ज्या गावात त्या इतरांच्या जमिनीवर काम करत होत्या, खपत होत्या तिथेच आज त्यांनी अनेकींच्या हाताला काम मिळवून दिले आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......