twitter
rss

📋आज ‘नीट’ परीक्षा; 11 लाख विद्यार्थी*

By pudhari | Publish Date: May 7 2017

मुंबई : प्रतिनिधी

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात  येणारी नीट परीक्षा रविवारी होत आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड अथवा सरकारी ओळख पत्र ठेवावे असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

देशभरात नीट परीक्षेसाठी 11 लाख 5 हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. देशभरात 56 हजार वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. 2016 मध्ये 7 लाख 5 हजार विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. हॉल तिकीटाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत आधार कार्ड अथवा अन्य सरकारी ओळखपत्र बरोबर ठेवावे. याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो देखील ठेवावा. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन गट करण्यात आले आहेत. ए गटातील विद्यार्थ्यांना 7.30 ते 8.30 या वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे.  तर, बी गटातील विद्यार्थ्यांना 8.30 ते 9.30 या वेळेत प्रवेश मिळणार आहे. 9.30 नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही असे मंडळाने स्पष्ट करण्यात आले आहे.

*बुरखा घालण्यास परवानगी...*

यावर्षी नीट परीक्षेसाठी बोर्डातर्फे ड्रेसकोड जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे यंदा बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश मिळणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना फुल स्लीव्हजचे कपडे परिधान करण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांनी गडद रंगाचे कपडे न घालता फिकट रंगाचे कपडे घालावेत. सॅण्डल, बूटाऐवजी स्लीपर घालाव्यात असेही सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📫 शाळांत आता तक्रारपेटी..!*

By pudhari | Publish Date: May 6 2017

मुंबई : प्रतिनिधी

शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थींनींची सुरक्षा तसेच मारहाण किंवा फी आदी कारणांसासाठी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी आता पहिली ते बारावीपर्यंत असणार्‍या सर्व शाळांत तक्रार पेटी बसवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. प्रत्येक आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ही पेटी उघडण्यासंदर्भातील सूचना शुक्रवारी जारी केलेल्या शासन निर्णयातून दिल्या आहेत.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांमध्ये दर्शनी भागात तक्रार पेटी शाळेच्या दर्शनी भागात, प्रवेशद्वाराच्या नजीक नजरेस पडेल अशा ठिकाणी ही पेटी ठेवावी असे म्हटले आहे.  तक्रारपेटी पुरेशी मोठी आणि सुरक्षित असेल याची काळजी शाळा प्रशासनाने घ्यावी. तक्रार पेटी आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात येणार आहे. तक्रारपेटी उघडताना शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी असावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्याठिकाणी पोलीस प्रतिनिधी येणे शक्य नसेल तिथे मुख्याध्यापक, प्राचार्य, पालकप्रतिनिधी उपस्थिती असताना तक्रारपेटी उघडण्यात यावी असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.

तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तक्रारदाराला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. गंभीर अथवा संवेदनशील तक्रार असल्यास पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने तत्काळ त्याची दखल घेण्यात यावी. तक्रारपेटीत आलेल्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. तक्रार निवारणही तत्काळ करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आले आहेत. तक्रार पेटीत महिला शिक्षक अथवा विद्यार्थिनींनी लैंगिक छळाबाबत तक्रार केली असल्यास शाळेच्या महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी या तक्रार पेटीचा उपयोग होणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🥀 *गांधीजींची शाळा बंद होणार*

Updated May 5, 2017, 11:32 PM IST
वृत्तसंस्था, राजकोट

इंग्रजांच्या काळातील १६४ वर्षांचे राजकोट येथील अल्फ्रेड हायस्कूल बंद करण्याचा निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळेत १८८७ मध्ये महात्मा गांधी यांनी आपले शिक्षण घेतले होते. शाळेच्या वास्तूचे रूपांतर आता संग्रहालयात केले जाणार आहे. गेल्या वर्षीच शाळेऐवजी या वास्तूत संग्रहालय उभारणार असल्याचा निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतला होता. महात्मा गांधी १८८७ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडले होते.

या वर्षी या शाळेत १२५ विद्यार्थी शिकत होते. या सर्व विद्यार्थ्यांनी अन्य शाळेत प्रवेश घेतला असून, त्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी राजकोट पालिकेने राज्य सरकारकडे शाळा बंद करून त्याऐवजी तेथे संग्रहालय उभारावे, असा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने शाळा बोर्डाला सर्व कारभार राजकोट महापालिकेकडे सुपुर्द करण्यास सांगितले. ‘शाळेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी आम्ही एक सल्लागार कमिटी नियुक्त केली असून, यासाठी अपेक्षित खर्च सुमारे १० कोटी रुपये असणार आहे. तसेच, या ठिकाणी गांधीजी यांच्यासह सरदार पटेल आणि इतर अन्य प्रमुख व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर संग्रहालयात माहिती दिली जाईल,’ असे राजकोट पालिकेचे आयुक्त बी. एन. पाणी म्हणाले.

*शैक्षणिक स्तर घसरला*

या शाळेची स्थापना १७ ऑक्टोबर १८५३ मध्ये झाली. त्या वेळी शाळेचे नाव राजकोट हायस्कूल असे होते. त्यानंतर १७ ऑक्टोबर १८५३पासून भारतावर ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यानंतर शाळेचे माध्यम इंग्रजी भाषेत करण्यात आले. त्यामुळे सौराष्ट्रातील पहिली इंग्रजी शाळा अशी या शाळेची ओळख झाली. सध्याची अल्फ्रेड हायस्कूलची इमारत १८७५मध्ये जुनागढच्या नवाबांनी बांधली. परंतु, त्यानंतर ड्यूक ऑफ इडनबर्ग प्रिन्स अल्फ्रेड यांच्या नावाने या शाळेचे नामकरण करण्यात आले. १९४७मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही शाळा मोहनदास गांधी हायस्कूल नावाने ओळखली जाऊ लागली. या शाळेचा शैक्षणिक स्तर मात्र घसरला आहे

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⛳ *मुंबई महापालिकेने बांधल्या हायटेक शाळा*

May 6, 2017
सामना ऑनलाईन । मुंबई

चकाचक लाद्या, भलेमोठे हॉल, स्वच्छ टॉयलेट, रंगीबेरंगी भिंती, प्रशस्त मोकळे वर्ग हे चित्र यापुढे पालिकेच्या शाळांमध्ये दिसू शकणार आहे. पालिकेने मोठ्य़ा प्रमाणावर शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली असून त्यापैकी तीन सुसज्ज शाळा बांधून तयार झाल्या आहेत. परेल-भोईवाडा, कामाठीपुरा आणि एमएचबी या तीन पालिका शाळांच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले असून येत्या जूनमध्ये मुलांना या हायटेक शाळांमध्ये बसून शिकता येणार आहे.

एरवी गळकी छपरे, कळकट भिंती, दुरवस्था झालेली शौचालये काही वर्षांपूर्वीचे पालिका शाळांचे चित्र पालटण्याचे महापालिकेने ठरवले आहे. पालिकेने एकूण ९८ शालेय इमारतींची ४११ कोटींची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी तीन शाळा तयार झाल्या आहेत. या शाळांची नुकतीच शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

पालिका शाळांचेही ब्रँडिंग
पालिकेच्या शाळांत पटसंख्या वाढवण्यासाठी आतापर्यंत शिक्षकांना गल्लोगल्ली जाऊन विद्यार्थी अक्षरशः धरून आणावे लागत होते. मात्र यापुढे पालिकेच्या शाळांबाहेर ‘प्रवेश सुरू’चे बोर्ड लावण्याचे निर्देश शुभदा गुडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार हे बोर्ड शाळांच्या बाहेर लावण्यात आले आहेत.

पालिका शाळांतील मुलांना मिळतात या सुविधा मोफत
– पाठ्य़पुस्तके, गणवेश, 27 शालोपयोगी वस्तू
– शिष्यवृत्ती
– संगीत, क्रीडा प्रशिक्षण, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान केंद्र,
– टॅब, व्हर्च्युअल क्लासरूम, बससेवा, माध्यान्ह भोजन
– बालवाडी ते दहावीपर्यंत मोफत शाळा, वाचनालय, ग्रंथालय, कौशल्य विकास प्रशिक्षण
– विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग आणि बार्ंनग मशीन
– दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती योजना, टॉय लायब्ररी, मोफत वैद्यकीय तपासणी.

पालिकेच्या शाळांमार्फत मुलांना असंख्य सोयीसुविधा मोफत दिल्या जातात, मात्र कित्येक पालकांना त्याबद्दल माहिती नसते. व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब अशा अत्याधुनिक यंत्रणाही विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मग पालिकेने अशा गोष्टी पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरात का करू नये?

– शुभदा गुडेकर, शिक्षण समिती अध्यक्षा

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃