twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣6⃣7⃣

*#लढा_पडा_घडा..!*

लोक काय म्हणतील ? हा विचार अनेकांच्या प्रगतीला बाधा ठरलेला आहे. मी कुठेतरी एक चित्ररूपी प्रसंग वाचला होता. एका गाढवाला घेऊन एक पती पत्नी रस्त्याने चालत निघालेले असतात. पहिल्या चित्रात ते पती पत्नी आणी गाढव तिघेही चालताना दाखवलेले होते. त्यावर लोकांची प्रतिक्रिया असते की, "काय मूर्ख आहेत हे? गाढवाचा काय उपयोग मग?" दुसर्‍या चित्रात दोघेही गाढवावर बसलेले दाखविलेले आहेत त्यावर लोकांची प्रतिक्रिया अशी की, " किती निर्दयी आहेत हे, मुक्या जनावराची जरासुद्धा दया नाही यांना!" बायकोला गाढवावर बसवून पती चालत दाखविलेल्या तिसर्‍या चित्रावर लोकांची प्रतिक्रिया असते की, "बायकोच्या किती आहारी गेलेला आहे पहा!" आणि चौथ्या चित्रात नवरा गाढवावर बसलेला आहे आणि बायको चालत आहे. त्यावर लोक म्हणतात की, "किती स्वार्थी व्यक्ती आहे हा? बायकोला चालायला लावून स्वतः मात्र गाढवावर बसून चाललाय". सांगायचा मुद्दा असा कि काही लोकांना फक्त नावं ठेवायची सवय असते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
अनेक उमद्या तरूणांच्या प्रयत्नांना बाधा पोहचविण्याचं काम ही मंडळी करत असतात. आयुष्याची दिशा ही स्वतः ठरवायची असते आणि त्या दिशेने स्वतःशी प्रामाणिक राहून वाटचाल करायची असते. मी जे करत आहे ते योग्य व विधायक आहे, नियमांना धरून आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे असं स्वतःच्या मनाला पटलं की ते स्विकारायचं आणि पुढं जायचं.
चुकीच्या कामाला चुकीचं म्हणणारी जशी माणसं आहेत तशी चांगल्या कामालासुद्धा वाईट घोषित करून त्याचा अपप्रचार करणारे महाभाग समाजात खूप आहेत. ते पदोपदी आढळतात. त्यांच्याशी वाद न घालता पुढे जायचं. आपलं काम करत रहायचं. कारण मूर्खांशी वाद घातला की ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणून सोडतात. आपल्या विरोधात उगीचच कोणी अपप्रचार करत असतील तर त्यांना अजिबात किंमत न देता साफ दुर्लक्ष करणं आणि आपणं अधिक वेगानं प्रगती करणं यापेक्षा चांगलं उत्तर नाही.
मी शिक्षक असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. 'वेड लागलंय त्याला, घर नाही रहायला आई बांगड्या भरत फिरते आणि ह्याला चांगली सरकारी नोकरी लागली तर त्याचा राजीनामा दिलाय....' असं बरचं काही काही म्हणत होते लोक तेंव्हा. ज्यावेळी मी आय.ए.एस.झालो तेंव्हा तेच लोक म्हणू लागले की " धाडस आणि स्वतःवरचा विश्वास काय असतो हे रमेश घोलप कडून शिका. सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याची डेरींग केलती त्यानं. ठरवलं ते केलंच" म्हणजे असे असतात लोक. लोक काय म्हणतील याचा विचार केला असता तर आज मी आय.ए.एस. झालो नसतो. आयुष्यात स्वतःच्या क्षमता, आवड, स्वप्नं स्वतःला माहित असतात. त्यानुसार निर्णय घ्यायचे. लोक काहीही म्हणू द्या, स्वतःच्या प्रयत्नांनी तो निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवायचे. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही असं लोक म्हणत असतात तेंव्हाच ती गोष्ट करून दाखविण्यात मजा असते.

*मित्रांनो,*

_*"प्रयत्न सोडू नका, सडू नका लढत रहा, पडत रहा, घडत रहा..!"*_

*-रमेश घोलप IAS*