twitter
rss

🌱केंद्राच्या ‘शाळासिद्धी’ला राज्यात अत्यल्प प्रतिसाद*

First Published :22-February-2017

अविनाश साबापुरे / यवतमाळ

देशातील प्रत्येक शाळा प्रगत करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘शाळासिद्धी’ उपक्रम सुरू केला आहे. दर्जेदार शिक्षण देत असल्याबाबतचे ‘शाळासिद्धी’ हे सरकारी मानांकन मिळविणे आता प्रत्येकशाळेला बंधनकारक आहे. मात्र, यासाठी सध्या सुरू असलेल्या स्वयंमूल्यमापनाच्या प्रक्रियेला महाराष्ट्रातील ८० टक्के शाळांनी दांडी मारली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या ‘न्यूपा’ संस्थेतर्फे देशभरातील शालेय प्रशासनाचा अभ्यास आणि सुधारणा केली जाते. या संस्थेच्या निरीक्षणातच आता प्रत्येक शाळेला ‘शाळासिद्धी’ प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘न्यूपा’च्या पोर्टलवर सर्वप्रथम शाळांनी नोंदणी करणे, स्वयंमूल्यमापन करणे आवश्यक आहे. त्यानंतर, या शाळांचे बाह्यमूल्यमापन करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील १ लाख ९९२ शाळांनी नोंदणी केली. मात्र, आता स्वयंमूल्यमापन सुरू झालेले असताना यातील ८० टक्के शाळांनी माघार घेतली आहे. स्वयंमूल्यमापनाची मुदत २८ फेब्रुवारी असताना तब्बल ८२ हजार ५४९ शाळांनी स्वयंमूल्यमापनाशी संबंधित माहिती अद्याप पोर्टलवर भरलेली नाही. केवळ १८ हजार ४४३ शाळांनीच ही माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या दबावामुळे इच्छानसतानाही अनेक शाळांची नोंदणी करण्यात आल्याचे शिक्षक वर्तुळातून समजले. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात केवळ कागदोपत्री दिसण्याची शक्यता आहे.

*स्वयंमूल्यमापन टाळणाऱ्या शाळांची जिल्हानिहाय संख्या*

अहमदनगर ४६३८, अकोला १५०४, अमरावती २५२३, औरंगाबाद ३१९९, भंडारा ११२०, बीड ३४३२, बुलडाणा १९८०, चंद्रपूर १७५८, धुळे १६३४, गडचिरोली २०६९, गोंदिया १४७६, हिंगोली १२३५, जळगाव २८२९, जालना १९५३, कोल्हापूर २८३२, लातूर १९७६, मुंबई ७५५, नागपूर ३८०४, नांदेड ३०००, नंदूरबार १७००, नाशिक ४७८७, उस्मानाबाद १४४१, पालघर २७४२, परभणी ४०२, पुणे ३१९७, रायगड ३६५०, रत्नागिरी २५४३, सांगली २१७७, सातारा २२८१, सिंधुदुर्ग १५५३, सोलापूर ३५८०, ठाणे ३२१५, वर्धा १३१०, वाशिम ११९९, यवतमाळ २९६५

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे दीर्घ रजेवर*

By pudhari

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यावरील शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव सोमवारी जिल्हा परिषदेने शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव गेल्यानंतर शिंदे यांनी गुरुवारपासून एक महिन्याच्या दीर्घ रजेवर जात असल्याचा अर्ज दिला आहे. त्यांचा पद्भार निरंतर शिक्षणाधिकारी बी. बी. भंडारी यांच्याकडे बुधवारी दिला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यासंदर्भातील तक्रारीवरील ‘इन कॅमेरा’ चौकशीचा अहवाल चौकशी अधिकारी  अतिरिक्त सीईओ इंद्रजित देशमुख यांनी गेल्या शनिवारी सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे सादर केला होता. या चौकशी अहवालात  पदमान्यता, दफ्तर दिरंगाई, अपुर्ण रेकॉर्ड, शासन आदेशाचे उल्लंघन असा ठपका ठेवण्यात आहे. अहवालात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तक्रारीचे स्वरूप गंभीर असल्याने शिक्षण आयुक्तांमार्फत सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेकडून हा अहवाल शनिवारीच दिला जाणार होता, पण वेळेअभावी तो देता न आल्याने सोमवारी तो रितसर पाठवण्यात आला.

यासंदर्भात सीईओ डॉ. खेमनार यांच्याशी संपर्क साधला असता  त्यांनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे या 23 फेब्रुवारीपासून एक महिन्याच्या रजेवर जात असल्याचा अर्ज आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यांचा पदभार प्रौढ व निरंतर शिक्षणाधिकारी बाबासाहेब भंडारे यांच्याकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.  दरम्यान, शिक्षणाधिकार्‍यांच्या रजेवरून सक्तीची की सोयीची यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📋 ‘विक्रीकर’ मुख्य परीक्षेतील 10 प्रश्‍न रद्द*

By pudhari | Publish Date: Feb 21 2017

कोल्हापूर : संग्राम घुणके

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 26 नोव्हेंबर रोजी विक्रीकर निरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेची उत्तरतालिका आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. आयोगाकडून यामध्ये मराठी व इंग्रजी (पेपर क्रमांक 1) या  प्रश्‍नपत्रिकेतील 7 प्रश्‍न रद्द करण्यात आले आहेत. तसेच सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता (पेपर क्रमांक 2) या प्रश्‍नपत्रिकेतील 3 प्रश्‍न रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या परीक्षेच्या निकालाकडे सर्व परीक्षार्थींचे लक्ष लागून राहिले आहे.

सामान्यज्ञान व बुद्धिमापन (पेपर क्रमांक 2) या प्रश्‍नपत्रिकेतील 3 प्रश्‍न आयोगाने रद्द केले असल्याचे संकेतस्थळावर नमूद केले आहे. याबाबत आयोगाने म्हटले आहे उमेदवारांनी अधिप्रमाणीत स्पष्टीकरण संदर्भ देऊन पाठविलेली लेखी निवेदने, तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाकडून  उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. याबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत तसेच कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

आयोगाकडून परीक्षा झाल्यानंतर त्याची उत्तरतालिका जाहीर केली जाते व त्याबाबत आक्षेप असल्यास लेखी आक्षेप मागविले जातात. या परीक्षेत प्रश्‍नपत्रिकेत अनेक प्रश्‍नांची उत्तरे संदिग्ध स्वरूपाची होती. त्यामुळे परीक्षेनंतर आयोगाच्या प्रश्‍नपत्रिकेतील उत्तराबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे असे संदिग्ध पर्यायी उत्तरे असणारे दोन्ही प्रश्‍नपत्रिकातील प्रश्‍न आयोगाकडून रद्द करण्यात आले आहेत. नुकतीच आयोगाने नवीन उत्तरतालिका जाहीर केली आहे. हे प्रश्‍न रद्द केल्यामुळे त्या प्रश्‍नाचे गुणही कमी होणार आहेत. त्यामुळे याबाबत अनेक परीक्षार्थीत तीव्र नाराजी आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎓शिवाजी विद्यापीठ दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात*

By pudhari

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या 53 व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’पाठविण्याचे काम सुरू आहे.

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तीन दिवसांवर आला आहे. त्याच्या अनुषंगाने कुलगुरू नियुक्त केलेल्या विविध समित्यांचे कामकाज सुरू आहे. रंगरंगोटी, मंडप उभारणीसह निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. ग्रंथ महोत्सव व ग्रंथ दिंडींचे नियोजन सुरू आहे. दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे.

दीक्षांत समारंभासाठी महानगरपालिकेच्या वतीने के.एम.टी.ची विशेष बससेवा देण्यात येणार आहे. शुगरमिल व शिवाजी चौक येथून नियमित बसेस सकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू राहणार आहेत.

प्रवाशांना शिवाजी चौक ते विद्यापीठ (आवार) 11 रुपये दर आकारण्यात येणार आहे. बाहेरगावांहून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे फाटक येथून बससेवा राहणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन के.एम.टी.च्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी केले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃