twitter
rss

📋 बारावीच्या पेपरफुटीमागे मुख्याध्यापक*

*पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक*

नवी मुंबई, 11 मार्च 2017/ AV News Bureau:

बारावीच्या पेपर फुटीप्रकरणी एक टोळीच सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीमध्ये विरार येथील पालघर माउंट मेरी शाळेच्या मुख्याध्यापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेवून पेपर फोडीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान शाळेचा मुख्याध्यापकच या प्रकरणात प्रमुख आरोपी असल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर 2 मार्च रोजी मराठीचा आणि 4 मार्च रोजी सेक्रेटरीयल प्रॅक्टीस या विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अपवरून प्रसारीत करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करीत अझरुद्दीन कमरुद्दीन शेख, राहुल बच्छेलाल भास्कर (दोघेही राहणार मालाड) हे एसवायबीकॉमचे विद्यार्थी, शेख मो. अमन मो. इस्लाम (राहणार कांदिवली) बारावीचा विद्यार्थी आणि खासगी क्लासेसचा शिक्षक असणारा सुरेश विमलचंद झा यांना 6 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास करीत 11 मार्च रोजी इतर आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये विरार येथील पालघर माउंट मेरी शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापक आनंद रामदास कामत (43), शाळेचा हेड क्लार्क गणेश सुधाकर राणे (30), वकील आणि खासगी शिकवणी क्लासेसचा चालक असणारा अड. निखील शंकर राणे (29) तसेच नालासोपारा येथील शिक्षण आणि खासगी क्लासेसचा चालक असणाऱ्या विनेश अशोक धोत्रे (27) यांना अटक करण्यात आली आहे.
आनंद कामत आणि गणेश राणे हे त्यांच्या शाळेत प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका संचांचे पाकिट उघडून प्रश्नपत्रिकांचे मोबाइलवर फोटो काढून ते अड. निखील राणे याला पुरवित असे. राणे हा हे प्रश्नपत्रिकांचे फोटो विनेश धोत्रे याला व्हॉट्स अपवर पाठवित असे. धोत्रे हे फोटो विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ग्रुपकडून पैसे स्वीकारून त्यांना व्हॉट्स अपद्वारे प्रश्नपत्रिकेच्या पानांचे फोटो पुरवित असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती नवी मुंबई सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पत्रकारांना दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

😔 सांगली : दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या*

By pudhari | Publish Date: Mar 11 ,2017

जत : प्रतिनिधी/ बिळूर: वार्ताहर

इंग्रजी विषयाचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या शुभम रामराव झारी (वय 17) या शाळकरी विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुभम बिळूर, (ता. जत) येथील श्री गुरूबसवेश्‍वर हायस्कूलमध्ये शिकत होता.

हायस्कूलच्या जवळच शुभम याचे घर व शेत आहे. इंग्रजी विषयाचा पेपर संपल्यानंतर तो शनिवारी दुपारी घरी आला. आई व वडील दोघेही शेतात होते. घरात द्राक्षावर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध त्याने प्राशन केले. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला तातडीने जतमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शुभम शाळेत सर्वांचा आवडता होताशाळेतही तो हुशार होता. इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने तो खूपच निराश झाला होता. त्यामधूनच त्याने औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.याबाबत जत पोलीसांत नोंद झाली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रतीक्षाच*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शिक्षण हक्क कायद्यानुसार ठरविण्यात आलेल्या संचमान्येतेनुसार राज्यातील अनेक अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. याप्रकरणी शिक्षण आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही अनेक संस्थाचालकांनी या शिक्षकांचे समोयोजन पूर्ण केले नसल्याचे समोर आले आहे. परिणामी अनेक शिक्षकांची पगाराचा प्रश्न ही तसाच असून, याप्रकरणी अनेक शिक्षक संघटना एकवटल्या आहेत.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संचमान्यतेनुसार (शिक्षक विद्यार्थी प्रमाण) राज्यातील अनेक शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यातील काही शिक्षकांच्या समोयाजनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली होती. मात्र त्यानंतर ही शिक्षण विभागाने समायोजन केलेल्या काही शिक्षकांना दाखल करून घेण्यास संस्थाचालकांनी विरोध केल्याने अनेकांचे समायोजन रखडले आहे. त्याप्रश्नी अनेकांनी शिक्षण आयुक्तांकडे याबद्दल दाद मागितल्यानंतर १९ नोव्हेंबरला अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेणाऱ्या मुख्याध्यापकांवर महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती अधिनियम १९७७ मधील कलम ४ अ नुसार कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

त्यासंदर्भातील पत्रक ही राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना दिले होते. मात्र त्यानंतरही शिक्षण आयुक्तांच्या या आदेशास अनेकांची केराची टोपली दाखविल्याने अनेकांच्या समायोजनाचा तर पगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋 राज्यसेवेत १.७७ लाख पदे रिक्त!*

*गृह, आरोग्य, शिक्षण विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा*

मधु कांबळे, मुंबई

४४ हजार अधिकाऱ्यांची गरज; गृह, आरोग्य, शिक्षण विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा
नागरिकांना तत्पर सेवा मिळण्यासाठी सेवा हमी कायदा केला जातो, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर वानवा आहे. राज्य शासन आणि जिल्हा परिषदांमध्ये सध्या १ लाख ७७ हजार पदे रिक्त आहेत. त्यात वर्ग एक व वर्ग दोनच्या ४४ हजार ५९२ रिक्त पदांचा समावेश आहे. गृह, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण इत्यादी महत्त्वाच्या विभागांमध्येच मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्य शासनाचे वेगवेगळे विकासांचे प्रकल्प व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग किती असावा, याचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आकृतिबंधात सुधारणा केली जाते; परंतु गेल्या काही वर्षांत राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कारण सांगून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकरभरतीवर र्निबध घालण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य शासन आणि जिल्हा परिषदांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त राहिली आहेत.


राज्य शासनाच्या २८ विभागांतील व त्यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयांमधील एकूण मंजूर पदे, प्रत्यक्ष कार्यरत अधिकारी व कर्मचारी आणि रिक्त पदे किती, याबाबतची ३० सप्टेंबर २०१६ पर्यंतची माहिती उपलब्ध झाली आहे. माहिती अधिकारातून हा संपूर्ण तपशील प्राप्त झाला आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदांमध्ये १० लाख ५४ हजार ३७६ इतकी मंजूर पदे आहेत. त्यात शासनाच्या ६ लाख ९३ हजार २७७ आणि जिल्हा परिषदांच्या ३ लाख ६१ हजार ९१ पदांचा समावेश आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदांमध्ये एकूण मंजूर पदांच्या १ लाख ७७ हजार जागा सध्या रिक्त आहेत. त्यात शासनामधील ३७ हजार ९५९ आणि जिल्हा परिषदांमधील ६ हजार ९३३ वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा समावेश आहे.
आकडय़ांच्या भाषेत
सामान्य प्रशासन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार गृह विभागात २३ हजार ९१६, सार्वजनिक आरोग्य विभागात १८ हजार २६१, जलसंपदा विभागात १४ हजार ६१६, कृषी विभागात ११ हजार ९०६, महसूल व वन विभागात ८ हजार ६५८, वैद्यकीय शिक्षण विभागात ६ हजार ४७८, उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३ हजार २३६ आणि शालेय शिक्षण विभागात ३ हजार २८० पदे रिक्त आहेत.
राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त जागा भरण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे. पदोन्नतीने रिक्त जागा भरण्यास कोणतेही बंधन नाही. मात्र सरळसेवेने भरावयाच्या रिक्त जागांबाबत थोडे र्निबध घालण्यात आले आहेत. एकूण मंजूर पदांच्या चार टक्के किंवा रिक्त जागांच्या पन्नास टक्के पदे भरण्यास शासनाची मान्यता आहे

    – मुकेश खुल्लर (अप्पर मुख्य सचिव- सामान्य प्रशासन विभाग)

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃